
जिल्ह्यातील २१,९४० हेक्टरवर २कोटी ४४लाख वृक्षारोपण
संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी
ग्रीन महाराष्ट्र मिशन’ (हरित महाराष्ट्र) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा हरित चेहरा बदलण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आगामी १० वर्षांत जिल्ह्यातील शासकीय पोटखराब २१,९४० हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे .विविध विभागांच्या समन्वयातून हे काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी सामाजिक वनीकरण विभागास दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित हरित आयोगाच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी वृक्ष लागवडीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी. एम, प्रादेशिक वन अधिकारी सुवर्णा माने, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके,सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी संदीप गिरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी रुपेश शिंगारे, यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, वृक्षारोपणासाठी केवळ वनविभागाच्या जमिनीवर अवलंबून न राहता, शासकीय पडीक ,पोटखराब जमीन, खाजगी कमी दर्जाची जमीन, जलसंपदा विभागाचे क्षेत्र, उद्योग विभाग, कृषी विभाग आणि महानगरपालिका यांच्या अखत्यारितील मोकळ्या जागांचा वापर करण्यात येणार आहे. जमिनीच्या उपलब्धतेनुसार क्षेत्रनिश्चित केले जाईल.याचे नियोजन वन विभाग आणि संबंधित यंत्रणेला करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले.सामाजिक वनीकरण, कृषी आणि वनविभागाच्या नर्सरीमधून दर्जेदार रोपांचा पुरवठा केला जाणार आहे.वृक्षारोपणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जलसंधारण, रोजगार हमी योजना, ग्रामपंचायत आणि जिल्हा रेशीम कार्यालय यांच्याशी समन्वय राखून काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
संबंधित विभागाने वृक्ष लागवडीसाठी योग्य जागांचे तातडीने नियोजन करावे, जेणेकरून पावसाळ्याच्या काळात लागवडीचे काम गतीने पूर्ण होईल. यावर्षी पावसाचे पाणी कमी असणार आहे . याचा नियोजनात विचार करुन अधिकचे उद्दिष्ट पुढील काही वर्षात नियोजित करावे. जेणेकरून वृक्ष जतन करण्यासाठी उपयोग होईल.
हरित महाराष्ट्र मिशन’ हे केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित नसून, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे हे याचे मुख्य ध्येय आहे. १० वर्षांचा कालावधी असल्याने, लागवड केलेल्या रोपांचे संवर्धन , जतन करण्याची जबाबदारीही संबंधित विभागांवर सोपवण्यात आली आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील हरित पट्ट्यात मोठी भर पडणार असून, निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड आणि संगोपनात सहभागी होणे आवश्यक आहे.
वनराई बंधारे’ निर्मिती करण्यात पुढाकार घ्यावा
वृक्षारोपणासोबतच ती जगविण्यासाठी जलसंधारणावर भर देण्यास जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी विशेष सूचना दिल्या .यात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस विविध विभागांच्या आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने ‘वनराई बंधाऱ्यांची’ निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले.वनराई बंधारे बांधण्यात लोकसहभाग आणि श्रमदानातून करण्यावर प्रशासनाचा भर असेल. यासाठी
कृषी विभागाने जलसंधारण विभागाच्या मदतीने बंधाऱ्यांसाठी जागा निवडणे, त्यांचे तांत्रिक नियोजन करणे आणि आवश्यक प्रशिक्षण देण्याचे काम करावे.
सामाजिक दायित्व निधीचा (CSR) वापर करून अधिकाधिक बंधारे निर्माण करण्याचे नियोजन तालुकास्तरापर्यंत करावे. यात तालुका आणि जिल्हास्तरीय अधिकारी देखील विशिष्ट दिवशी श्रमदानातून वनराई बंधाऱ्याच्या निर्मितीमध्ये सहभाग घेतील.यांबाबत सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी- कर्मचारी यांना पुढाकार घेण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे