
पैठण तालुका प्रतिनिधी
पैठण तालक्यातील चितेगाव येथील एस. एम. इंडस्ट्रीज (गट क्र. ११८) कंपनीत कामावर असताना कामगाराचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई व नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालय, कामगार उपायुक्त कार्यालय तसेच ESIC कार्यालयाकडे सुरक्षा असंघटित कामगार संघटनेच्या वतीने तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे
.स्व. बबन गनपत पटेकर (वय ४५) हे कंपनीत दीर्घकाळ कार्यरत होते. कंपनीचे मालक रामेश्वर सारडा व परेश सारडा यांनी त्यांना अमरावती विभागात रस्त्यावरील दिशादर्शक फलक बसविण्याच्या कामासाठी पाठविले होते. मात्र, कामाच्या ठिकाणी राहणे, जेवण, आरोग्य व सुरक्षिततेच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कामगारांना आयशर गाडीतच राहणे व झोपणे भाग पडत होते, ही बाब अमानुष असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
९ जानेवारी २०२६ रोजी पुसदा (जि. अमरावती) येथे कामावर असताना त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हा मृत्यू कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतरही कुटुंबास कोणतीही आर्थिक मदत किंवा नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही.
तक्रारीनुसार, कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने न देता धोकादायक परिस्थितीत काम करून घेतले जात होते तसेच आरोग्य व आपत्कालीन सुविधांचाही अभाव होता. कामगार कायद्यांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, विभागीय उपायुक्त मजुशा मिसकर मॅडम यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी व मयताच्या कुटुंबास किमान २० ते २५ लाख रुपये नुकसानभरपाई तात्काळ मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे.